सर्वसामान्य पती-पत्नी यांचे नातेसंबंध सर्वांनाच माहित आहे परंतु त्या प्रेमासोबत विश्वास एकमेकांचा आदर एकमेकांप्रती असणारी विनम्रता फारच कमी जोडप्यांमध्ये असते.सावित्रीमाई फुले आणि जोतीबा फुले दांपत्य आदर्श दांपत्य आहे. सावित्रीमाईंचा आणि जोतीबा यांचा संसार सर्वसामान्य संसार नव्हता या जोडीने संसारासोबत समाजसेवेचे व्रत स्वीकारले होते.शुद्र अतिशूद्र लोकांना आधार देण्याचे त्यांना सर्वसामान्य जीवनाची अधिकार बहाल करण्याचे व्रत अंगीकारले होते. सावित्रीमाई च्या पत्रातून काव्य लेखनातून पती जोतीबा विषयीचे प्रेम तसेच पती विषयीचा आदर, त्याचसोबत सामाजिक भानही दिसून येते.
सावित्रीमाई या काळाच्या पुढच्या
गृहकृत्यदक्ष पत्नी, आदर्श बहिण, आदर्श मुलगी, आदर्श माता तसेच आदर्श समाजसेविका या सर्व रुपांमध्ये सावित्रीमाई त्यांच्या पत्रलेखनातून, काव्यलेखनातून दिसून येतात. तत्कालीन काळात उच्चतम विचार जोपासणाऱ्या सावित्रीमाई या काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या होत्या हे निर्विवाद सत्य आहे.
सर्वसामान्य स्त्री आपल्या पतीला प्रापंचिक अडचणी सांगेल, घरातील वाद सांगेल, घरी काय नाही हे सांगेल, काय हवंय ते मागेल पण सावित्रीमाई त्यांच्या पत्रलेखनातून समाजातील अनेक समस्या व त्याचे निराकरण, ज्योतिबांच्या कार्यासाठी मानसिक आधार देतात. पतीच्या कार्यात मदत करतात. ज्योतिबा फुले यांना भावनिक उभारी देतात. हे खरोखरच अलौकिक आहे. पत्राची सुरवातच अशी आहे की पत्नी आपल्या पतीला किती आदर देऊ शकते हे दिसून येते. सावित्रीमाईंच्या पत्राची सुरवात ” सत्यरुप जोतिबास्वामी यास, सावित्रीचा शिरसाष्टांग नमस्कार” अशी होती.
भट लोक सोवळ्यात असता तुलाही अस्पृश्य मानतात तुझाही विटाळ धरतात.तुलाही महार-मांग समजतात.
सावित्रीमाईंच्या भावाने त्यांना बोलले की, ” तु व तुझा नवरा वाळीत असूनही तुम्ही महारामांगादी लोकांकरता जी कामे करता ती पतित (पापी) असुन आपल्या कुळाला बट्टा लावणारी आहेत. तुला सांगतो की भट जसे सांगेल तसे जातीरुढीप्रमाणे आचरण करावे” यावर सावित्रीमाई राग न करता शांतपणे म्हणतात की,
” भाऊ तुझी बुध्दी कोती असून भटांच्या शिकवणीने दुर्बल झाली आहे. तु शेळी व गाय यांना कुरवाळतोस, नागपंचमीला विषारी नागाला पकडून दूध पाजतोस. महार-मांग तुझ्यासारखेच मानव आहेत त्यांना अस्पृश्य समजतोस त्याचे कारण सांग? भट लोक सोवळ्यात असता तुलाही अस्पृश्य मानतात तुझाही विटाळ धरतात. तुलाही महार-मांग समजतात. ” सावित्रीमाई पुढे म्हणतात की, ” विद्याहिनता ( अशिक्षितपणा) ही पशुत्वाची खूण आहे. भट लोकांच्या श्रेष्ठत्वासाठी आधारभूत विद्या आहे. विद्येचा महिमा मोठा आहे. जो कोणी विद्या प्राप्त करून घेईल त्याची उचनीचता दूर होऊन उच्चता त्याचा अंगीकार करेल. माझे स्वामी देवमाणूस आहे. त्यांची सर या देशात कोणालाही येणार नाही. महारामांगादी लोकांनी शिकावे असे भटांना अपायकारक होणार असल्याने ते आमच्या माणूस धर्माच्या कामास अब्रम्हण्यम् अब्रम्हण्यम् करीत निंदा करत आहेत.”
सावित्रीमाईंच्या कवितेतून ज्योतिबा फुले यांच्याविषयी असलेला अपार आदरभाव आणि प्रेम कवितेच्या शब्दाशब्दातून दिसून येते. सावित्रीमाईंच्या सुबोध रत्नाकर या काव्याचा प्रारंभच इतका आदरभावाने ओतप्रोत भरलेला आहे की त्याला तोड नाही.
” जयाचे मुळे मी कविता रचिते।।
जयाचे कृपे ब्रम्ह आनंद चित्ते।।
जयाने दिली बुध्दी ही सावित्रीला।।
प्रणाम करी मी यती जोतीबाला।।
तिसऱ्या कडव्यात त्या लिहीतात,
करी शूद्रसेवा दिले धैर्य त्यांना।।
क्रियाशील नेता अशा जोतीबाचा।।
नसे जात त्याला तसे पंथ काही।।
तया वंदुनी सावित्री काव्य वाही।।
जोतीबाचा बोध
सावित्रीमाईंच्या जोतीबा या काव्यात जोतिबा फुले यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा आढावा त्यांनी घेतला आहे. जोतिबांचा संपूर्ण जीवनपट उलगडताना त्यांना कर्मठ ब्राम्हणांनी दिलेला त्रास, शिक्षणाप्रतीची ओढ, जोतिबा फुले यांचा झालेला अपमान, सावित्रीमाईंच्यावर झालेले हल्ले, शेण-दगडाचा मारा इत्यादी गोष्टी आहेत. या कवितेची सुरवात पण जोतिबांच्या वंदनेने करणारी सावित्रीमाई खूप महान आहेत. त्या ओळी पुढीलप्रमाणे –
चिमा थोर माता पिता गोविंदाजी
तयाचे कुशी जन्मला जोतिबाजी
सती धन्य माता यती धन्य पिता
तया वंदिते आदरे जोतिकांता
पतीवर अभंग रचणारी सावित्रीमाई कदाचित पहिलीच पत्नी असावी. “जोतीबाचा बोध” या अभंगातून सावित्रीमाईंच्या पतीविषयीची प्रेमाची उत्कटता, आदर, कार्याचा आढावा दिसून येतो.
स्वामी जोतिबांच्या। लागो मी चरणी।
त्यांची गोड वाणी। मनी घुमे।
महारा मांगांची। करते मी सेवा।
आवडीच्या देवा। स्मरुनिया।
दुसर्या एका कडव्यात त्या लिहीतात
जोतिबांचे बोल। मनात परसा।
जिवाचा आरसा। पाहते मी।
ऐसा बोध देती। अनुभवे जोती
मनात ठेविती। सावित्री मी।
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on SEP 29, 2021 10:50 AM
Web Title – Thoughts of Savitrimai’s husband Jyotiba