जेष्ठ पत्रकार निखिल वागळे ‘निर्भय बनो’ आंदोलनाच्या निमित्ताने सभेसाठी पुण्यात आले असताना त्यांच्या गाडीवर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केला.वागळे यांची कार फोडली. तसेच दगडफेक करत लाठ्या काठ्यांनी काचा फोडून गाडीवर शाईफेकही करण्यात आली. निर्भय बनो आंदोलन अंतर्गत एका सभेचं आयोजन राष्ट्रसेवा दल तर्फे करण्यात आलं होतं.निखिल वागळे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी एक ट्विट केले होते,त्या ट्विटमधील भाषा आक्षेपार्ह असल्याचा दावा करत भाजपा कार्यकर्ते वागळे यांच्याविरोधात आक्रमक झाले होते. तसेच हा कार्यक्रम होऊ नये यासाठी भाजपाचे नेते पदाधिकारी प्रयत्न करत होते. भाजपा कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांना पुण्यात येण्यासही विरोध केला होता. तसेच त्यांच्या विरोधात पोलिस स्टेशन मध्ये विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच प्रशासनाने या सभेस परवानगी देऊ नये अशी मागणीही भाजपाने केली होती. तरीदेखील हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम स्थळी जाताना तसेच संपल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी वागळे यांच्यावर हल्ला केला.
दरम्यान,वंचित बहुजन आघाडीने सदर प्रकरणी भूमिका घेत पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
“भाजपा-आरएसएसच्या गुंडांनी उघडपणे धमकी देऊनही पुणे पोलीस निखिल वागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुरक्षा पुरवू शकले नाहीत.
वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की, पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब राजीनामा द्यावा.
आम्ही मानतो की, कुठल्याही पत्रकार किंवा माध्यम क्षेत्रातील व्यक्तीला अशा प्रकारचा शारीरिक हिंसेचा सामना करावा लागू नये.”
असे पत्रक वंचित बहुजन आघाडीने सोशल मिडियावर प्रकाशित केले आहे.
“निखिल वागळेंवर हल्ला करणारे कुत्रे होते का ? ” रोहित पवारांचा फडणवीसांना सवाल
रोहित पवार यांनी ट्विटर (एक्स ) या सोशल मिडिया साईटवर एक पोस्ट करत प्रश्न विचारला आहे की,
“पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडणारे आणि त्यांच्यावर हल्ला कारणारेही कुत्रेच होते का?”
‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील’ असं वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केलं. मला त्यांना विचारायचं आहे की,
‘पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडणारे आणि त्यांच्यावर हल्ला कारणारेही कुत्रेच होते का?
कुत्रे नसतील आणि भाजपाचे कार्यकर्ते असतील तर आता तरी आपण राजीनामा देणार का?’
निखिल वागळे यांनी सोशल मिडियामध्ये पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
प्रिय मित्र- मैत्रिणीनो, भावांनो-बहिणींनो,
काल मृत्यू दारात दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो.
मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव,
पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर,
रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू?
भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..
काँग्रेसचे अरविंद शिंदे, वंचित आणि आपचे कार्यकर्ते, धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य..
कुणाकुणाची नावं घेऊ? सगळ्यांचा मी ऋणी आहे.
आजवर सहा हल्ले पचवले. कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता. दगड, लाठ्याकाठ्या, हॅाकी स्टिक्स, रॅाड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला.
अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला घेरण्यात आलं. पोलीसांच्या संगनमताने हा हल्ला झाला.
काल आम्ही सगळे वाचलो केवळ फुले-आंबेडकर यांच्या आशिर्वादाने ही माझी श्रद्धा आहे.
आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिजमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू.
अशा भ्याड हल्लांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत.
या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन एवढंच इथे सांगतो.
तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही.
कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात..आभार कसे मानू?
जास्त बोलवत नाही. कालच्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलो नाही. संध्याकाळी तुमच्याशी सविस्तर बोलीनच.
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी हा हल्ला कसा झाला याबद्दल माहिती दिली
असा घडवला भाजपाच्या गुंडांनी सुसंस्कृत पुण्याच्या रस्त्यावर हैदोस:
पोलीस क्लिअरन्ससाठी आम्ही तीन तास वाट बघितली. नंतर संध्याकाळी 7 वाजता मात्र वागळे सरांनी पोलीसांना सांगितलं की एकतर आम्हाला अटक करा नाही तर सभेला जाऊ द्या. वागळे सर गाडीत बसले. त्यांच्या एका बाजूला असीम आणि एका बाजूला मी बसलो. ॲड. श्रीयाला असीमनं पुढे बसवलं, गाडी identify होऊ नये म्हणून. ड्रायव्हिंगच्या वैभव बसला ज्याच्या ड्रायवींग कौशल्यामुळे आम्ही काल वाचलो. आमचा बहाद्दर साथी ॲड. बाळकृष्ण निढाळकर रस्त्यावर गाडी समोर पळत होता आणि गाडी कुठून घ्यायची ते सांगत होता. सुमाराला आमची गाडी पुणे आणि मागे साध्या वेशातल्या पोलीसांची गाडी असा प्रवास सुरू झाला.
पहिला हल्ला प्रभात रोडला इराणी कॅफेजवळ झाला. मोटार सायकलवर आलेल्या भाजपच्या गुंडांनी आणि त्यांच्या रस्त्यावरच्या साथीदारांनी गाडीवर दगड आणि अंडी फेकली. गल्ली क्र. 4 मध्ये ते दबा धरून बसले होते. आमच्या कारच्या बाजूला ते मोटार सायकलवर होते.
थोडे पुढे म्हणजे प्रभात रोड जिथं कर्वे रोडला जोडतो तिथं भाजपाचे आणखी 25-30 गुंड उभे होते. त्यांनी आमची कार अडवून गाडीवर काठ्या आणि राॅड मारत काचा फोडायला सुरूवात केली. पोलीसांची तयांची धुमश्चक्री झाली. साध्या वेशातल्या पोलीसांवरही भाजपचे हे गुंड हात चालवत होते हे आम्ही बघत होतो. दरम्यान कारच्या समोर धुमश्चक्री होत होती म्हणून बाळकृष्ण आणि काही पोलीसांनी आम्हाला गाडी रिवर्समध्ये घ्यायला लावली. आम्ही कर्वेरोडवरून कोथरूडच्या दिशेनं निघालो.
भाजपाचे गुंड आमचा फिल्मी स्टाईलमध्ये पळत आणि मोटार सायकलवर फिल्मी स्टाईल पाठलाग करायला लागले. वैभवनं त्यांना एसेम जोशी पुलावर चकवा दिला आणि गाडी वैकुंठमधून काढली. तोपर्यंत ते शास्त्री रस्त्यावरून आले आणि सेनादत्त पोलीस चौकीच्या सिग्नलवर त्यांनी आम्हाला गाठलं. मात्र तिथं स्वतः प्रशांतदादा जगताप आणि त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्यासाठी उभे होते. त्याच वेळी काॅग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे सुनील मोरे, गजानन थरकुडे आणि ओरिजनल शिवसैनिक, राहुल डंबाळे यांचे कार्यकर्ते, आंबेडकरी कार्यकर्ते, युक्रांदचे जांबवंत मनोहर आणि सर्व कार्यकर्ते तसंच विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सभास्थळी आमच्यासाठी छातीचा कोट करून उभे होते.
त्यांनी आम्हाला शेवटचं गाठलं ते दांडेकर पुलाच्या सिग्नलला. तिथं राष्ट्रवादीच्या भक्ती कुंभार नावाच्या रणरागिणीनं त्यांना अडवायचा प्रयत्न केला. त्यात त्या आणि त्यांचा तीन चार महिला साथी जखमी झाल्या. भाजपच्या गुंडांनी त्यांनाही मारलं. इतके निर्ढावलेले गुंड सत्ताधारी पक्षात आहेत ही शरमेची गोष्ट आहे.
मोठमोठे दगड मारल्यामुळे गाडीच्या मागच्या काचेचा चक्काचूर झाला होता. तिथून हे भाजपचे गुंड राॅड आत टाकण्याचा प्रयत्न करत होते. असीमनं वागळे सरांचं डोकं खाली धरून ठेवलं आणि आम्ही तिघंही डोकं खाली करून लागणार नाही असे बसलो होतो.
वैभवनं प्रयत्नांची शर्थ करून गाडी दामटली. वास्तविक पाहता समोरची काच अंड्यांमुळे संपूर्णतः blind झाली होती तरीही या पठ्ठ्यानं वेगात आणि रस्त्यावरच्या कोणालाही जखमी न करता गाडी साने गुरूजी स्मारकात पोचवली. तिथं शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर आमची वाट पहात होते. आम्ही पोचल्यावर त्यांनी महात्मा गांधी की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय अशा घोषणा दिल्या.
भाजपाच्या गुंडांचा हा रस्त्यावरचा थरार आम्ही तब्बल पंचवीस मिनिटं अनुभवला. आपण मेल्यात जमा आहोत असं तीन प्रसंगी वाटलं. कल्पना करा की चाळीस ते पन्नास लोक काठ्या, राॅड, दगड घेऊन पाच जणांचा पाठलाग करत आहेत.
भाजपाच्या गुंडांनी रस्त्यावर दहशत निर्माण केली. आसपासचे लोक भयचकित होऊन हा राडा पहात होते. रस्त्यावर इतरही आयाबहिणी असतांना हे भाजपाचे गुंड वागळे सरांच्या नावानं अर्वाच्य शिव्या जोरजोरात देत होते. वागळ्याला खाली खेचा असं जोरजोरात बोंबलत होते. रस्त्यावर सामान्य माणसं भयभीत होऊन त्यांना जागा करून देत होती. एखाद्या गुंडागर्दीवाल्या सिनेमाचं दृश्य भाजपच्या गुंडांनी सुसंस्कृत पुण्याच्या रस्त्यावर करून दाखवलं.
सभागृहात वागळे सर आणि पोचल्यावरचा जल्लोष आम्ही कधीही विसरू शकणार नाही असा होता. आमचं बळ शतपटीनं वाढलं.
हे पुण्यात होतंय यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाही. दरम्यान पोलीसांना ‘भाजपाच्या गुंडांना हात लावू नका’ असा आदेशच वरून आला असावा म्हणून त्यांनी एकाही गुंडाला ना अटक केली ना गुन्हा नोंदवला आहे.
रात्री उशिरा घरी आल्यावर फडवीसांची प्रतिक्रिया पाहिली ती अतिशय धक्कादायक होती. ‘कायदा सुव्यवस्था कोणीच मोडू नये, ज्यांनी हे केलं त्यांना शिक्षा होईल पण उच्च पदस्थ नेत्यांबाबत बोलतांना नीट बोलावं’ असा त्यांच्या प्रतिक्रियेचा आशय होता. थोडक्यात काय तर मोदी शहांबद्दल बोलाल तर यापुढे भाजपचे गुंड कोणालाही रस्त्यावर मारतील असा इशारा ते आपल्यालाच देत आहेत.
भाजपच्या उच्चस्तरीय नेत्यांच्या मूकसंमती शिवाय एवढा मोठा हल्ला भाजपचे गुंड करतील असं मला अजिबात वाटत नाही.
निदान नाटक म्हणून तरी दोन चार गुंड पकडले असते पण पोलिसांवर एवढी दहशत आहे की त्यांनी एकाही गुंडाला,
अगदी त्यांच्या अंगावर जाणाऱ्या गुंडांच्याही अंगाला धक्का लावला नाही.
हे सगळं धक्कादायक आहे आणि आम्ही या विरूद्ध सतत लढत राहूच. निखील वागळे सरांच्या धैर्याला मानाचा मुजरा.
मोदी शहांच्या नेतृत्वाखाली फडणवीसांनी महाराष्ट्र गुंडगिरीत बिहार आणि उत्तर प्रदेशाच्या पुढे नेऊन ठेवला आहे. कुठे यांच्या पक्षाचा तालुकाध्यक्ष वक्त्याचा माईक हिसकावून घेतो, कुठे यांचा आमदार पोलीसांसमोर एका व्यक्तीवर सहा गोळ्या झाडतो, कोणीतरी घोसाळकर नावाच्या तरुणाला फेसबुक लाईव्ह करत मारतं तर पुण्याच्या सुसंस्कृत रस्त्यांवर भाजपचे गुंड निखील वागळे नावाच्या 66 वर्ष वयाच्या पत्रकाराला मारण्यासाठी रस्त्यावर राडा करतात. या घटनेचे सगळे व्हीडीओ मिडीयावर उपलब्ध आहेत. पाहून खात्री करा.
हात बांधलेले पोलीस आणि रस्त्यावर राडा करणारे भाजपाचे गुंड. महाराष्ट्रातलं हे गुंडाराज तुमच्या समोर जसं पाहिलं तसं मांडलं. पुढचा निर्णय तुम्हीच घ्या.
.
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने महाविकास आघाडीच्या साठी दिलेला लिखित स्वरूपातील किमान समान कार्यक्रम
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 10,2024 | 12:55 PM
WebTitle – Nikhil Wagle attack case: Pune Police Commissioner should resign immediately – Vanchit demands