भक्ती नाकारलेला विवेकी आंबेडकरी समाज
“Bhakti in religion may be a road to the salvation of the soul. But in politics, Bhakti or hero-worship is a sure road to degradation and to eventual dictatorship.”
Dr B. R. Ambedkar, in his last speech to the Constituent Assembly of India
“धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या उद्धाराचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा नायक पूजा हा अधोगती आणि अंततः हुकूमशाहीचा मार्ग आहे.” – डॉ. बाबासाहेब तथा भीमराव आंबेडकर
व्यक्तिपूजा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील देशाला उद्देशून केलेलं हे शेवटचं भाषण.त्या भाषणातील हे एक उद्धरण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाला सावध करतात.नायक पूजा करू नका.कोणत्याही एक व्यक्तीला मोठं करू नका म्हणून बजावतात.अलिकडे देशात एक देश एक भाषा आणि एक संस्कृती (पुढे एकदाच निवडणूक)अशी देशाच्या विविधतेला वैविध्यपूर्ण वैशिष्ट्याला तडा देत धोकादायक आखणी आस्ते कदम रजवण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.त्यासोबतच व्यक्तिपूजेचे स्तोम माजवले जात आहे.अनेक बड्या लोकप्रिय लोकाना स्वत:ला “भक्त” म्हणवून घेण्यात आसुरी आनंद मिळतो आहे.ही व्यक्तिपूजा उघड आणि घातक मार्गावर जाऊ लागली आहे.
याउलट परिस्थिती आंबेडकरी समाजाची आहे.या समाजाला आंबेडकरांची भक्ती करणारा समाज,आंबेडकरांना एका जातीत बंदिस्त करणारा समाज अशी चुकीची लेबल्स लावण्यात काही लोक धडपडत असतात.मात्र आंबेडकरी समाजाने कायम विरोधकांचे आरोप खोटे ठरवून स्वत:ला सिद्ध केलं आहे.
आंबेडकर या फक्त नावासाठी इथं आपला जीव तळहातावर घेऊन उतरणारे लोक आहेत
ज्या व्यक्तीचा आदर विश्वातील मोठमोठे देश करतात,जी व्यक्ती मानवी संघर्षाच्या लढ्यात एक आदर्श प्रेरणा ठरते अशा व्यक्तीस स्वदेशात मात्र तिरस्कार द्वेष आणि राग भेट म्हणून मिळतो हे या देशाचं करंटेपण आहे.
आंबेडकरी समाजाला भावनिक समाज म्हणून आरोप केला जातो,जेव्हा डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते तेव्हा आंबेडकरी समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटतात.पुतळ्याची विटंबना करणारा एक कुणीतरी व्यक्तीच असते,त्याची सुद्धा एक टोकाची भावना असते,त्याव्यक्तीला आंबेडकर सहन होत नाहीत.त्यामुळे मनात जहरी द्वेषाची भावना प्रबळ असते.त्यातून असे गैरकृत्य निपजते.आंबेडकरी समाजाची तीव्र प्रतिक्रिया या नाकारण्याच्या मुद्याशी आहे.अस्तित्व सहन न होणं, विचार सहन न होणं माणुसपण नाकारणं या गोष्टीला तीव्र आक्षेप असतो त्याचं ते उत्तर.त्याला भावनिकता,भक्ती वगैरे म्हणने चुकीचे.
तसेच महापरिनिर्वाण दिनाचे आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती गरीब कष्टकरी मेहनती शोषित वंचित समाजात अनन्यसाधारण महत्व आहे.ते कोणत्याही गोष्टीपेक्षाही वेगळं आहे.आंबेडकर या फक्त नावासाठी इथं आपला जीव तळहातावर घेऊन उतरणारे लोक आहेत.इथंही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे हे कोणत्याही टोकाच्या भावनिक अवस्थेतून येत नसून त्यावेळी मिळणाऱ्या ‘नकारामुळे’ आहे.नकाराचं सांस्कृतिक सामाजिक राजकारण हजारो वर्षापासून समाज भोगत आला आहे. यापार्श्वभूमीवर हे पाहणे गरजेचे ठरते.
हजारो वर्षांची गुलामीची शृंखला तोडून काढली
या नकाराने सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय ,शैक्षणिक असं कोणतंही क्षेत्र नव्हतं जिथे नकार मिळाला नाही.
एक मोठा वर्ग ज्याची टक्केवारी जवळपास 70% भरेल म्हणजे एक देश,या एका देशाला स्व-विकास करण्यापासून रोखण्यात येत होते.
भौतिक पातळीवर दमन केले जात होते.या नकाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्तविरहित क्रांती करत होकारात प्रवर्तित केले.
जे शक्य नव्हतं ते अशक्यप्राय शक्य करून दाखवलं.हजारो वर्षाचा नकार,हजारो वर्षांची गुलामीची शृंखला तोडून काढली.
सर्वाना समान पातळीवर आणलं,अमानुषपणे वागणाऱ्या क्रूर सोशक लोकाना माणुसकी शिकवली माणसांत आणले.
ज्याना माणूस सुद्धा समजलं जात नव्हतं त्यांना त्यांच्यासोबत बसवून आत्मसन्मान मिळवून दिला.
यागोष्टी पूर्वाश्रमीच्या बहिष्कृत वर्गाला नवा जन्म देणाऱ्या ठरल्या.
याची त्यांना परतफेड करता येत नाही,त्या ऋणातून मुक्त होता येत नाही.
म्हणून त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी हा उद्देश चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असतो.
मागीलवेळेस मोठा पाऊस झाला त्रेधा उडाली.एकमेकाना आधार देत एकमेकांच्या डोळ्यातील अश्रु पुसत हा समाज पुन्हा उभा राहिला.
मुंबईतील दंगल,त्यानंतरचे बॉम्बस्फोट,पुढे पुन्हा दहशतवादी हल्ले,
पुन्हा मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट अशी अनेक संकटे या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर आली,
मात्र चैत्यभूमीवरील गर्दीवर त्यामुळे यत्किंचितही फरक पडला नाही,
न घाबरता न डगमगता भीम सैनिक देशाच्या कानकोपऱ्यातून दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होत आला.आणि दरवर्षी यात भरच पडत गेली.
भावनिक न होता प्रॅक्टिकल निर्णय घेतला गेला
यावेळी कोरोना संसर्गाचे संकट होते.इथे काहीसे वेगळे वातावरण ठरले.कारण हा संसर्ग गर्दीमुळे होते,गर्दीत संपर्कात येणाऱ्या व्यक्तीना लवकर लागण होते.ही त्याची शास्त्रीय वैज्ञानिक कारणे,आयुष्यभर विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणाऱ्या समाजाने भावनेपेक्षा विज्ञानाला महत्व दिलं नाही तरच नवल.इथेही ते स्वाभाविकपणे घडलं.लोकांनी विज्ञानाला साथ दिली.
भक्ती नाकारलेला विवेकी आंबेडकरी समाज
जागतिक आरोग्य संघटना, सरकार, शासन, प्रशासनाने दिलेली नियमावली काटेकोर पाळत समाजाने विवेकी भूमिका घेतली.आणि ती कृतीतून सिद्ध देखिल केली.आम्हाला आमचा उद्धारकर्ता वाचवेल,चमत्कार करेल.आमची श्रद्धा आहे.आम्ही कट्टर भक्त आहोत असला काही प्रकार इथे असण्याची शक्यता सुद्धा नव्हती.त्यामुळे भावनिक न होता प्रॅक्टिकल निर्णय घेतला गेला.आंबेडकरी समाजातील तरुणांनी यासाठी विशेष मेहनत घेतली,सोशल मिडिया, स्थानिक संघटना, मंडळे इत्यादींच्या माध्यमातून समाजात जनजागृती केली गेली.तसेच चैत्यभूमीच्या पत्त्यावर पोस्टकार्ड पाठवण्याचे आवाहन केले गेले,.
भीम अनुयायांचा जनसागर
देशभरातून या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला,लाखों करोडो पोस्टकार्ड चैत्यभूमीवर येवून धडकले.दरवर्षी भीम अनुयायांचा जनसागर दादरला उसळतो असतो,सरमोरच्या अरबी समुद्राशी स्पर्धा करत असतो,यावेळी पोस्ट कार्डचा सागर उसळला असे म्हणने वावगे ठरवणार नाही.चैत्यभूमीला न जायला मिळाल्याने आपलं काही वाईट होईल,आपलं नुकसान होईल,आपल्या आयुष्यात विघ्न येतील,असं काहीच इथे उद्भवलं नाही.कुणी कोपेल रागवेल शिक्षा करेल असं काहीही अवैज्ञानिक इथे नव्हतं, आंबेडकरी अनुयायांनी दाखवून दिले की ही भक्ती नाही.ही भावनिकता नाही.हा समाज डॉक्टर आंबेडकरांना मोक्षदाता मानत नाही तर मार्गदाता मानतो,उद्धारकर्ता मानतो.त्याचे बोट धरून हा समाज त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करतो आहे.विचारांनी समृद्ध आहे.प्रगल्भ आहे.तुम्ही कुणी त्यांना भावनिक म्हणून क्षणिक आनंद घ्याल, परंतु शांतपणे विचार केल्यास लक्षात येईल की या गोष्टीचं खरतर अनुकरण केलं पाहिजे.यातच खरा उत्कर्ष आहे.
या विवेकी भूमिकेचं आम्ही स्वागत करतो.
टीम जागल्या भारत
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी भीम अनुयायांच्या भूमिकेचे कौतुक करताना म्हटले की
“आज भीम सैनिकांनी शिस्त आणि संयम याचे अद्भुत दर्शन घडवले आहे.”
मुंबईच्या विद्यमान महापौर सौ.किशोरी पेडणेकर यांनी भीम अनुयायांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या ‘ऑनलाईन’ अभिवादनाला दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे, महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल अनुयांयाचे विशेष आभारही महापौरांनी मानले आहेत.आंबेडकरांचे स्मारक असणारे ‘चैत्यभूमी’ हे प्रेरणादायी स्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण विश्वाला वंदनीय आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे या व्यासपीठावर आम्ही विराजमान आहोत.असेही त्यांनी स्पष्ट केले.
6 डिसेंबर 2020
हेही वाचा.. संविधानामुळे भारतीय स्त्रिया गुलामीतुन मुक्त
हेही वाचा.. जयभीमवाले टिळक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)