दिवाळी म्हटली की सगळीकडे आनंदी वातावरण जो तो या आनंदाच्या डोहात बेधुंद होऊन जातो. दिवाळीची चाहूल लागताच. नोकरदार, मध्यमवर्गीय, श्रीमंत, गर्भश्रीमंत आपापल्या घराची रंगरंगोटी, कपडे लत्ते, सोनं नाणं, विविध फराळ च्या लिस्ट केली जाते. विविध प्रकारचे विविध रंगाचे आकाशकंदील पाच सहा दिवस आधीच घरांवर झळकू लागतात.. प्रस्थापित लोकांच्या घरादारातुन पहाटे पहाटे सुगंधित उटण्याचा दरवळ पसरत जातो. सगळीकडे कसं अगदी प्रसन्न वातावरण परंतु गोरगरीब, कष्टकरी, भूमिहीन लोकांची दिवाळी अशी नसते हो..!
———————-
लोकं सुद्धा भाबड्या आशेनं प्रथेचे वाहक होत राहतात
कडूबा व त्याच्या सोबतची टोळी दिवाळीच्या आठवडा भरपूर्वीच गावांतील जमीनदारांची मक्का, सोंगणीला घेतली होती..सगळ्यांच्या डोळ्यात दिवाळीचा सण या वर्षी चांगला आनंदात साजरा करू म्हणून एक वेगळीच चमक होती. सगळेच मक्काच्या रानात जीवतोड मेहनत करत होते. नजर जाईल तिथपर्यंत फक्त जमीनदाराचच मक्याचं रान दिसत होतं. शंभर सव्वाशे एकरचा पट्टा होता तो.. दोन दिवसांपूर्वीच सर्व मक्का मोडून झाली होती. आता फक्त कापणी करून चाऱ्याची व्यवस्थित सुडी रचून कणसांची मळणी करणे बाकी होते.
सगळेच जोमाने कामाला लागले होते. हळूहळू सर्व कामे होत आली होती. रानाच्या एका कोपऱ्यात मोठ्ठं खळ करून त्याठिकाणी मक्काच्या कणसांचा ढीग लागला होता. आता फक्त मळणी बाकी असल्याने टोळीतील सगळ्यांच्या बायका घरी राहून आपापल्या घराची साफसफाई करून चकाकत करीत होते. कुडामातीचं का असेना पण दिवाळीच्या सणात ज्याचे घर स्वच्छ आहे, तिच्या घरात लक्ष्मी विराजी माता होते.असा समज असल्याने कुडाच्या घरातील लोकं सुद्धा भाबड्या आशेनं या प्रथेचे वाहक होत राहतात..!
सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला
कडूबाची बायको तारा ने देखील छापराच्या कुडाच्या भिंती पांढऱ्या मातीने सारवून लक्ख करून टाकल्या होत्या. दारासमोरील अंगण व्यवस्थित करून तळहातासारखं गुळगुळीत करून त्यावर सडा सारवण करून अंगणाचं रूपच बदलून टाकले होते.. बदल तरी का करणार नाही कारण मुलगी पहिल्यांदाच दिवाळीला माहेरी आली होती. तिची ही लग्न झाल्या नंतरची पहिलीच दिवाळी होती. कडूबाने कसं तरी उसनवारी, सावकाराकडून कर्ज काढून एकुलत्याएक मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात करून दिली होते.
तिकडे कडूबा व त्याच्या सोबतच्या टोळीतील शाम्या, कचऱ्या, दगड्या, रावश्या, परभ्या, शिरपा ही सगळी मंडळी रात पहाट करून जमीनदारांच्या गव्हाळीच्या रानात खळ्यावर मक्काच्या मळणी यंत्रावर काम करून मक्केची पोतेच्या पोते काठोकाठ टाचून भरून सुई धामन सुतळीनं शिवून थप्पीवर थप्पी रचल्या जात होती. ट्रॅकटच्या ट्रॉली भरून मक्काची पोती तसेच वावराबाहेर काढून मोंढा मार्केटमध्ये जात होती. शेवटचे पोते भरून झाल्यावर उपणेर (मळणी यंत्र ) ची धडधड बंद झाली.
सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.संपूर्ण काम व्यवस्थित पार पडले व यंदा जमीनदाराला मक्काचं उत्पन्न पण चांगले झाले त्यामुळे आपल्याला पण चांगली बिदागी मिळेल व आपला दिवाळीचा सण आनंदात साजरा करता येईल म्हणून सगळेच आनंदात होते. खळ्यावरील सगळी आवरा आवर करून खाली अंथरलेले फट्यांची व्यवस्थित घड्या करून फट्टे सलदाराच्या हवाली करून उद्याची स्वप्नं डोळ्यात साठवून सर्व मंडळी घराकडे मार्गस्थ झाली.
स्वप्नांची राख रांगोळी झाली
दुसऱ्या दिवशी सकाळी कडूबा, शाम्या, कचऱ्या, दगड्या, रावश्या, परभ्या, शिरपा
ही सगळी मंडळी जमीनदारांच्या वाड्यासमोर जाऊन उभे राहिले.
कितीतरी वेळ जोत्यावर बसून राहिले. जमीनदार सगळी देवपूजा आवरून झाल्यावर
एका हातात एकटांगी धोतराचा सोगा हातात धरून दुसऱ्या हातात छकडी घेऊन
कोल्हापुरी पायतानाचा करकर आवाज करीत वाड्याबाहेर आला.
कडूबा व त्याच्या टोळीने जमीनदाराला रामराम केला.
इकडच्या तिकडच्या माला बाबदच्या गप्पा झाल्यावर कडूबानेच पैशाचा विषय काढला
तेव्हा जमीनदार खोचक नजरेने त्यांच्याकडे पाहत म्हणाला की,
अरे गड्यांनो मी तुम्हाला कधी पर्यंत रान मोकळं करून द्यायला सांगितलं होतं.?
अन तुम्ही काम कधी पूर्ण केलं.? मला सांगा आज धनतेरस आहे.
शास्त्रात असं सांगितलंय की, धनतेरस पासून ते भाऊबीज पर्यंत आपल्या घरातील धन पैसा, अडका कोणाला देऊ नये.
मंग आता तुम्हीच सांगा मी तुम्हाला पैसे कसे देऊ? मी काही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही.
भाऊबीज झाली की या! तो पर्यंत तुम्ही काही माझ्याकडे येऊ नका..
तशी बी गरीबा घरी कशाची दिवाळी नि कशाचं काय..! जा निघा आता…! जमीनदाराला उलटून बोलायचं धाडस कोणातच नव्हतं.. ज्या स्वप्नंना डोळ्यात ठेऊन जीवतोड मेहनत केली होती. त्या स्वप्नांची राख रांगोळी झाली होती. हिरमुसलेले चेहरे घेऊन खाली मान घालून कडूबा व त्याची टोळी खिन्न मनाने घराकडे निघाली होती.
मायला या जिंदगीच्या अन त्या दिवाळीच्या बी…
मनातल्या मनात स्वतःच्या मनाला समजूत घालत होते. जाऊ दे आपण शिळी दिवाळी साजरी करू..! त्याला काय होतं.. नाही तरी आपल्या बापाजाद्यानी आपल्यासाठी काय कमावून ठेवलं.. ना जमीन ना घरदार ना कुठलं उत्पन्नाचं साधन सदा कष्टालाच भांडण आलं..! दुसऱ्याच्या हाताकडे पाहणं आलं. घरात लाईटच नाही तर कुठलं आपल्या पडक्या, छपरावर आकाश कंदील,आणि ती रोषणाई आपल्या रोजच्याच भाकरीचे वांधे तिथं कुठून आलं दिवाळीच फराळ लैच झालं तर करतो तरी आपण काय? फक्त रव्याचे लाडुच ना! थोडेशे भजे, कुरड्या, पुरण पोळी, तांदूळ घालून खीर अन चवीपुरते रस्सा बास झाली आपली दिवाळी..
लक्ष्मी पूजनाला आपल्या घरात असतं तरी काय.? तीच ती वर्षानुवर्षे कधीतरी खरेदी केलेली. लक्ष्मीची मूर्ती तिच्या समोर चार दोन लाह्या बत्ताश्या घातलेले बोळके, अन एक केरसुणी आणि दहा पाच रुपये.. हीच काय ती लक्ष्मीपूजन ची संपत्ती.. मायला वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. बायको दरवर्षी घरदार सडा सारवण, पोचारा करून लक्ख करते या भाबड्या आशेवर की, एकदा तरी लक्ष्मीचे पावले उघड्या घरात प्रेवेश करतील व आपल्या जिंदगीच पांग फिटेल…! ना अजून लक्ष्मीचे पावले घराकडे वळली ना आपल्या दारिद्र्य फिटलं…! मायला या जिंदगीच्या अन त्या दिवाळीच्या बी….
BY BABASAHEB THORAT (महाराष्ट्र पोलिस )
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)