अभिजनवादी सारस्वतांनी मानवी भावभावनांचे चित्रण त्यांच्या साहित्यात वास्तववादी न करता परीकथेसारखे, नयनरम्य देखाव्यासारखे, आणि रंगीत मनमोहक प्रेमकथेला साजेसे केले आहे. बहुतांश सारस्वत हे शहरी, निमशहरी भागात राहत असल्याने त्यांचा आणि खेडोपाडी वसलेल्या, दुःखी, दरिद्री, अल्पशिक्षित, अस्पृश्य, मागासवर्गीय, शेतमजूर, कामगार, रोजंदारीवर काम करणारे, हमाल, वेठबिगारी, चाकर, नोकर, देवदासी, वाघ्यामुरळी, तृतीयपंथी, बेरोजगार, ग्रामीण भागातील कलावंत, लोकशाहीर या लोकांशी फारसा संपर्क आला नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
ग्रामीण भाषेतील भाषासौंदर्य हे प्रांतवार बदलत असते.
काही लेखकांनी, कवींनी समाजातील दुर्लक्षित राहिलेल्या घटकांना आपल्या साहित्यात वाव दिला आहे पण भारतीय परीप्रेक्षाचा विचार केला तर असे साहित्यिक साहित्य क्षेत्रात अल्पसंख्य ठरतात.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अभिजनवादी साहित्य, ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य असे तीन गट पडले. त्याआधीही असे गट होते पण त्यांच्या सीमारेषा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अधिक गडद झाल्या. ग्रामीण भागातील अनेक दिग्गज लेखक, कवी यांचे दर्जेदार साहित्य निर्माण होऊ लागले. ग्रामीण भागातील साहित्यिकांनी शहरी भागातील वाचकांना रांगड्या भाषेतील झणझणीतपणाने नेहमीच्या अलंकारिक भाषेपेक्षा भाववर्णनाचे, प्रसंग, सौंदर्य आणि व्यक्तीचित्रणाचे नवे आयाम प्रस्थापित करुन दिले. ग्रामीण भाषेतील भाषासौंदर्य हे प्रांतवार बदलत असते. प्रत्येक प्रांतात भाषिक सौंदर्य, बोलण्याची पध्दत, वाक्प्रचार, म्हणी, आणि गेय साहित्यात बदल होत असतो. ते सर्व ग्रामीण भागातील अनेक दिग्गज साहित्यिकांनी मांडले.
दलित साहित्य
साहित्यिकांचा तिसरा जो वर्ग आहे तो म्हणजे दलित साहित्याचा. सकृतदर्शनी दलित साहित्य म्हणजे दलित समाजातील अनेक व्यथा, वेदनांचा अश्लील भाषेत घेतलेला आढावा हे नरेटिव सेट केले गेले. पण वास्तविक पाहता तसे बोलता येत नाही. कोणताही साहित्यिक असो तो कोणत्या समाजातून येतो हे लक्षात घेतले पाहिजे पण दुर्दैवाने तसे झाले नाही. शुभंकरोती म्हणत, पुजा अर्चना करत वही पेन हातात घेऊन लिखाण करणारे साहित्यिक आणि झोपडपट्टीत, मळलेल्या, खंगलेल्या,दीन असलेल्या वस्तीत लिहिणाऱ्या साहित्यिकात जमीन अस्मानाचा फरक आहे आणि हे वास्तव जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले गेले. अभिजनवादी सारस्वांचा आणि दलित समाजातील साहित्यिकांना जन्मजात लाभलेले वातावरण, संस्कृती, समाज, रूढी परंपरा यात खूप फरक आहे. साहित्यिक ज्या वातावरणात, संस्कृतीत, समाजात जन्मतो, वाढतो, मोठा होतो, त्याच्यावर जे संस्कार होतात, तो जे पाहतो तशा पध्दतीचे लेखन, मांडणी होत असते.
मान्यता देण्याची क्षमता असलेल्या अभिजनवादी साहित्यिक लोकांनी बहूजन लोकांचे जीवन, भावना, जग दुर्लक्षित ठेवले.
अभिजनवादी सारस्वतांकडे साधनांची कमतरता नव्हती. त्यांनी मनात आणले असते तर समाजातील दुर्लक्षित घटकांच्या जीवनावर, दुःखावर, अनुभवांवर, परिस्थितीवर कसदार लिहून मराठी साहित्य क्षेत्राला समृध्द बनवले असते. पण काही सन्माननीय अपवाद वगळता इतर साहित्यिकात तशी उर्जा, धमक निर्माण झाली नाही ही वस्तुस्थिती लाजिरवाणी आहे.अभिजनवादी सारस्वतांनी वरणभात, तुप भात सोडून गावरान कोंबडी, खर्डा, लाल तिखट याची चव तर चाखलीच नाही मग भेजा, गुडसा, वजडी याची चव तर दूरच. वरील उल्लेख केलेले पदार्थ हे केवळ ग्रामीण आणि दलित साहित्य यांचा निर्देश करण्यासाठी योजलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य असे की मान्यता देण्याची क्षमता असलेल्या अभिजनवादी साहित्यिक लोकांनी बहूजन लोकांचे जीवन, भावना, जग दुर्लक्षित ठेवले.
ग्रामीण भागातील साहित्यिकांमध्ये आणि दलित समाजातील साहित्यिकथांमध्ये अभिजनवादी सारस्वतांच्या पंगतीला बसण्याची शर्यत लागली होती.
आणि थोड्याफार प्रमाणात ही शर्यत आजही दिसते याचे कारण म्हणजे अभिजनवादी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मान्यता मिळवणे.
साहित्यिक सारस्वतांनी मान्यता देण्याचा अधिकार, हक्क आपल्याकडेच ठेवल्याने त्यांच्या गुडबुकमध्ये समाविष्ट होण्यासाठी इतर साहित्यिक धडपडताना दिसतात.
ग्रामीण साहित्य संमेलने, दलित साहित्य संमेलने जरी होत असली तरी ती पुरेशी नाहीत असे चित्र निर्माण झाले आहे.
अशावेळी ग्रामीण भागातील साहित्यिकांनी आणि दलित साहित्यकांनी एकत्रित येऊन संयुक्तपणे प्रयत्न केले पाहिजेत.
साहित्य क्षेत्रातील मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी असे प्रयत्न वारंवार केले पाहिजेत.
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)