महाराचं प्वार बिट्या लई हुशियार,बिट्या लई हुशियार
मुंबईतील महमंद अली रोड व आसपासचा परिसर हा मुस्लिम समाजाची बहुसंख्य वस्ती असलेला भाग.या ठिकाणी एखाद्या दलित व्यक्तीचा गाजावाजा व्हावा ही असंभवनीय अन आश्चर्याची गोष्ट.पण तसे घडले. बॅ.महंमद अली जीनांच्या सभेत खुद्द जीनांनी “महाराच्या प्वाराच्या” गौरवगीताचे सहर्ष स्वागत केले अन ‘वन्समोअर’ ही दिला.
ही गोष्ट १९३९ ची,१९३५ च्या कायद्याप्रमाणे सर्व भारतभर (फाळणीपुर्व भारत) प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका होऊन सात राज्यात कॉँग्रेस व इतर प्रांतात मुस्लिम लीगची मंत्रीमंडळे १९३७ पासून अधिकाररूढ झाली. २ सप्टेंबर १९३९ दुसरे महायुद्ध सुरू झाले होते.ब्रिटिश मंत्रिमंडळात असणाऱ्या कॉँग्रेसी मंत्रिमंडळाने गांधीजींच्या आग्रहाने राजीनामे दिले. या गोष्टीचे डॉ. आंबेडकर आणि बॅ. जीना यांनी स्वागत केले.यासाठी मुक्तीदिन साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले.मुक्तीदिनाची ही सभा डॉ. आंबेडकर आणि बॅ. जीना यांनी विचारविनिमय करून ठरवली.पण अचानक भेटीत हे ठरल्याने बाबासाहेबांना आपल्या सर्व अनुयायांना याची माहिती देणे शक्य झाले नाही.स्वतंत्र मजूर पक्षाच्या मुंबई शाखेतर्फे मुंबईच्या सर्व तत्कालीन अस्पृश्यांच्या मोहल्ल्यात ही माहीती गेली नाही.
कुलाबा,धोबीतलाव, आग्रीपाडा,नागपाडा,सात रस्ता,लव्हलेन,ताडवाडी,सैतान चौकी,परेल,नायगांव,वडाळा माटुंगा लेबर कॅम्प इत्यादी मुंबईतील तत्कालीन अस्पृश्यांच्या वस्त्या, त्यामुळे ज्याना ज्याना समजलं असे जवळच्याच वस्तीतील लोक या सभेला हजर राहू शकले.लव्हलेन मधून जी. जे. वैराट (गुरुजी) ,प्रभाकर गांगुर्डे,जी. एस. पाडळे,बी. टी. गायकवाड,आर. डी गायकवाड अशी काही मंडळी सोबत ताडवाडी विद्यार्थी संघाचे तांबे,येवले अशी विद्यार्थी मंडळी त्या सभेस होती.परंतु सभेस मुस्लिम समुदाय खच्चून होता. डॉ. आंबेडकर आणि बॅ. जीना येईपर्यंत स्थानिक लीगचे नेते स्टेजवर जमले त्यांनी करमणूक म्हणून “शायरी” सुरू केली.मुस्लिम बांधव शायरीला दाद देत होते.टाळ्या शिट्या वाजत होत्या.काहीवेळाने बॅ. जीना आले.उपस्थित मुस्लिम समुदाय स्वागतासाठी धावला. बॅ. जीनांच्या गौरवात घोषणा सुरू झाल्या. बॅ. जीना स्टेजवर स्थानापन्न झाले.आंबेडकर थोड्यावेळात येतील असे त्यानीच उपस्थित जनसमुदायास कळवले.काहीवेळाने बाबासाहेब आले.या सभेस उपस्थित असलेले पंधरा वीस कार्यकर्ते बाबासाहेबांच्या स्वागतासाठी धावले.अफाट जनसमुदायासमोर हे पंधरा विसजण म्हणजे दर्या में खसखस. भेंडी बाजारापर्यंतचा परिसर काळ्या शेरवाणीने फुलून गेला होता.काळी शेरवाणी आणि तंग विजार हा बॅ. जीना यांचा पोशाख,त्यादिवशी बाबासाहेबांनी देखील तसाच पोशाख केला होता.बाबासाहेब येताच उपस्थित कार्यकर्त्यानी जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली.”आंबेडकर कौन है? दलितों का राजा है |” आंबेडकर जिंदाबाद” प्रथमत: मुस्लिम बांधवांनी घोषणांना प्रतिसाद दिला नाही.परंतु बॅ. जीना यांनी बाबासाहेब समोर येताच त्यांना मिठी मारली,तेव्हा मात्र मुस्लिम बांधवांनी घोषणांना जोरदार प्रतिसाद देत परिसर दणाणून सोडला.घोषणा संपल्या आणि जीनांनी त्यांच्या शायरांना शायरी करण्यास फर्मावले .२-४ शायरी झाल्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.त्यानंतर बॅ. जीनांनी डॉ. बाबासाहेबांना सुचवले की आता तुमच्या एक-दोन शायरी होऊ द्या.
बाबासाहेबांनी उभे राहून विचारले..”अरे आपले कुणी लोक सभेला सभेत आहेत का?” एवढ्या मोठ्या जनसमुदायात तुटक तुटक असे १५-२० हात वर झाले.त्या सभेस तत्कालीन अस्पृश्य समाजातील फारतर २००-२२५ लोक उपस्थित असतील आणि ते विखुरलेले असल्याने त्यावेळचे दृश्य केविलवाणे होते.बाबासाहेब पुन्हा म्हणाले “अरे गाणारे कुणी असेल तर स्टेजवर या” कोणीच येत नाही असे पाहून बाबासाहेबांनी पुन्हा विचारले “अरे घेगडे आला आहे का?” शाहीर घेगडे त्यांच्या ७-८ सवंगड्यासह एका कोपऱ्यात होते,त्यांनी तिथे उभे राहून आपण आलो असल्याची वर्दी दिली.बाबासाहेबांनी त्यांना लगेच स्टेजवर बोलवून एक-दोन गाणी म्हणावयास सांगितले. घेगडे म्हणाले बाबासाहेब माझे शाहीरी साहित्य आणि नेहमीचे साथीदार नाहीत,मी कामावरून असाच परस्पर आलो आहे,आमच्या भागात सभेची वर्दी नव्हती,गिरणीतील कामगारांकडून मला समजले तेव्हा मी आलो.बाबासाहेब म्हणाले ” अरे नसू दे साथीदार नी साहित्य!तसाच म्हण” आता घेगड्यांची पंचाईत झाली.नाही म्हणावे तर बाबासाहेबांची आज्ञा मोडावी लागते व हो म्हणावे तर गाणे साहित्याविना व साथीदाराविना हमखास पडणार! दोन्ही बाजूंनी पंचाईत !पण अखेर घेगडे सरसावले. खाकरून खोकरून घसा साफ केला. तसा त्यांचा आवाजही फर्डा होताच! मोठ्या ठसक्यात त्यांनी “महाराचं प्वार” गीत म्हटलं..
महाराचं प्वार बिट्या लई हुशियार , बिट्या लई हुशियार |
साऱ्या जगात नाही आसं होणार अरे बघ बघ बघ बघ |धृ.|
आरं गरिबीत वडिलांनी शाळा शिकवली
विलायतला जाऊन त्यानं इद्या मिळवली
कायद्याचं झालंय लई मोठं बालिस्टार
बिट्या मोठं बालिस्टार
साऱ्या जगात नाही आसं होणार अरे बघ बघ बघ बघ |धृ.|
आरं कचेरी कोडाद कौन्सिल मंदी
भांडू भांडू उतरवी वैऱ्याची धुंदी
कायद्यानं कॉँग्रीसला केलंय बेजार
बिट्या केलंय बेजार !
साऱ्या जगात नाही आसं होणार अरे बघ बघ बघ बघ |धृ.|
आरं गौनेर-व्हाईसरॉय गोरा अधिकारी
गॉट-मॅट त्यांच्यासंगं बोलताय भारी
आन इंग्लासी सायबावाणी घालतंय इजार
बिट्या घालतंय इजार
साऱ्या जगात नाही आसं होणार अरे बघ बघ बघ बघ |धृ.|
आरे घेगडे म्हणे आम्हास्नी वाली
जाती मंदल्या बंद केल्या वंगाळ चाली
आरं लई बेस झालं बघा करा इचार
बिट्या करा इचार
साऱ्या जगात नाही आसं होणार अरे बघ बघ बघ बघ |धृ.|
प्रथमत: महाराचं प्वार हे गीत स्टेजवरील मुस्लिम बांधवांना समजले नाही.तसेच मैदानातील बांधवांना देखील समजले नाही,तेव्हा त्यावर उपस्थित पंधरा-वीस लोकांशिवाय टाळ्या पडल्या नाहीत.पण स्वत: बॅ. जीनांनी या गीताचा अर्थ त्यावेळी बाबासाहेबांकडून समजून घेतला. आणि नंतर लगेच सभेतील उपस्थित समुदायाला तो समजावून सांगितला घेगडेना पुन्हा गीत म्हणावे लागले.यावेळी मात्र श्रोत्यांनी व स्वत: बॅ.जीनांनी टाळ्यांचा कडकडाट केला.प्रत्येक चरणागणिक टाळ्या शिट्या वाजू लागल्या. या गाण्याला पुन्हा “वन्समोअर” मिळाला. त्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले.अशारितीने शाहीर घेगडे यांनी महमंद अली रोडवर “महाराचं प्वार” गाजवलं..
(हे शाहीर घेगडे नाशिक जिल्ह्याचे कारसुल वडाळीचे होते,त्यांची आणखी इतर बरीच गाणी त्याकाळी लोकप्रिय होती. ते अकाली मृत्यू पावले.)
– आंबेडकरी चळवळ मधून साभार
लेखक – आर. डी. गायकवाड
हे ही वाचा.. कॅनडामध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महिला वर्ग
हे ही वाचा.. ON RECORD: डॉ. आंबेडकरांच्या संविधान निर्मिती योगदानाबद्दल
डॉ.आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा स्थापन करणारा मराठा
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 09 , 2021 22 : 45 PM
WebTitle – Son of Mahar at Mohammed Ali road 2021-04-09